Saturday, 30 July 2011

छोड आयें हम वो गलियाँ..!

लोकसत्ता ३० जुलै २०११

गिरीश कुबेर उत्कृष्ठ लेख

हल्ली मध्यमवर्गात एक तरी नातेवाईक, मित्र वगैरे कोणीतरी परदेशात असतो. आयटीवाला असेल तर अमेरिका, युरोपात असं कोण कोण असतात. अगदीच गेलाबाजार सिंगापूर किंवा दुबईत तरी असतंच ओळखीपाळखीचं. मग त्यामुळे त्यांच्याकडे जाण्याच्या निमित्ताने एखादा तरी परदेश प्रवास होतो अनेकांचा. ल्यानंतर तिथल्या शिस्तीबद्दल, लोक कशी स्वच्छता पाळतात..गाडय़ा उगाच पों पों कशा करत नाहीत..पिवळा सिग्नल आला तरी गाडीवाले थांबतात..नाहीतर आपल्याकडे सिग्नल लालेलाल झाला तरी आपले लोक कसे गाडय़ा दामटतात..वगैरे चर्चा होतेच होते. आता आपल्याकडे काही सरकारने सांगितलेलं नसतं, सिग्नल हिरवा नसताना चौक ओलांडलाच पाहिजे म्हणून. पण तरी हे साधे नियम पाळणं देश म्हणून जमत नाही आपल्याला, हे आपण बघतच असतो. इतर कसे बेजबाबदार आहेत याचा फटका कधी ना कधी आपल्याला बसलेला असतो आणि आपल्या सामाजिक बेजबाबदारीचे चटके इतरांना सहन करावे लागलेले असतात. पण अर्थातच आपण सोडून सगळेच बेजबाबदार,असा प्रत्येकाचाच ठाम समज असल्याने परिस्थितीत काहीच बदल होत नाही.

पण विकसित जाऊ दे..अगदी दुबईत जरी आपला माणूस गेला तरी एकदम चित्र पालटतं. भारतातील वास्तव्यात शंभरातल्या वीस मार्काच्या वर न गेलेलं नागरिक शास्त्र सगळंच्या सगळं आपल्याला आठवायला लागतं आणि आपण सगळेच जबाबदार नागरिकासारखे वागायला लागतो.

हे सगळय़ाच क्षेत्रात होत असावं का? बहुधा हो. कारण पर्यटक म्हणून नाही तर व्यवसायात नाव कमवायची इच्छा असलेल्यालाही देशात राहण्यापेक्षा बाहेरच जाणं बरं वाटतं. तिथे सगळेच नागरिक शास्त्र पाळत असल्यामुळे असेल कदाचित. पण जगण्यातल्या फालतू, अनुत्पादक संघर्षांत वेळ जात नाही. त्यामुळे सगळी ऊर्जा चांगल्या कामावर केंद्रित करता येते, असं काही असावं का?

या क्षणाला आपले म्हणून गणलेले अनेक उद्योग देशापेक्षा बाहेरच जास्त गुंतवणूक करत असताना, या प्रश्नाचं उत्तर आपापल्या पुरतं का होईना, आपण शोधायची गरज आहे. टाटांसारख्या तद्दन भारतीय उद्योगाच्या एकूण उत्पन्नातला जवळपास ६० टक्क्यांपेक्षा जास्त उत्पन्नाचा वाटा परदेशांतून येत असेल.तर इथं काहीतरी चुकतंय असं आपल्याला वाटायला हवं. दोनच दिवसांपूर्वी आपल्या उदयपूरच्या शुद्ध तुपातला शाकाहारी असा अंशू जैन हा ड्वाईशे बँक या अतिबलाढय़ जर्मन बँकेचा सहप्रमुख म्हणून नियुक्त झाला, त्यामुळे हा प्रश्न पुन्हा वर आलाय. जगात असं पहिल्यांदाच घडलंय की कोणीतरी बिगरयुरोपीय व्यक्ती अशी ड्वाईशे बँकेच्या प्रमुखपदावर नेमली गेलीय. आणि त्यातलं महत्त्वाचं म्हणजे अंशूला जर्मन भाषाही येत नाही. गेल्या महिन्यात त्याला जेव्हा कुणकुण लागली, आपली या पदावर नेमणूक होणार आहे म्हणून, तेव्हा त्यानं जर्मन भाषेची शिकवणी लावली. ते कळल्यावर जर्मन भाषासुद्धा न येणारा जर्मनीतल्या अतिबलाढय़ बँकेच्या प्रमुखपदी जाऊन बसतो, तेव्हा आता त्या देशातली शिवसेना-मनसे काय करणार, हा जसा प्रश्न पडतो तसाच त्याहीपेक्षा महत्त्वाचा मुद्दा उपस्थित होतो. तो असा- आज भारतातल्या अनेक समर्थ मंडळींना देशी कंपनी, देशी वातावरण यापेक्षा परदेशी कंपनी आणि तेथील वातावरण यात काम करून यशस्वी होणं जास्त सोपं वाटतंय, अशी परिस्थिती आहे काय?

आजमितीला जगातल्या त्या त्या क्षेत्रात सर्वोच्च अशा कंपन्यांच्या प्रमुखपदी भारतीय आहेत. उदाहरणार्थ. अजय बांगा. हा मास्टर कार्ड कंपनीचा जागतिक पातळीवरचा मुख्य कार्यकारी अधिकारी आहे. तसं बघायला गेलं तर बांगा कुटुंबातल्या दोन्ही मुलांनी नाव काढलं. थोरले विंडी बांगा. हिंदुस्तान लिव्हरची जी पालक कंपनी युनिलिव्हर..तिच्या एका शाखेचे प्रमुख होते ते. यांचे वडील आपल्या लष्करात उपप्रमुखपदापर्यंत पोहोचले. शिक्षण शुद्ध भारतीय वातावरणातच झालं. वडिलांच्या सारख्या बदल्या व्हायच्या, त्यामुळे आम्हाला नवनव्या वातावरणाशी जुळवून घ्यायची सवयच लागली आणि व्यवसायात वाढत गेल्यावर लक्षात आलं वाढण्यासाठी आपल्यापेक्षा बाहेरच जास्त वातावरण चांगलं आहे ते, असं बांगाबंधू सांगतात.

असं वाटून घेणारे बांगाबंधूच फक्त नाहीत. मोटोरोला मोबिलिटी या अशाच दुसऱ्या महामोठय़ा कंपनीचा प्रमुख आहे संजय झा. नोकियाच्या उदयानंतर मोटोरोलाचे वाईट दिवस आले. तेव्हा या कंपनीला पुन्हा वर काढण्याची जबाबदारी संजयकडे देण्यात आली. युरोपातल्या सगळय़ात मोठय़ा आणि मान्यवर अशा व्यवसाय आणि व्यवस्थापकीय शिक्षण संस्थेचा प्रमुख आहे दीपक जैन. अमेरिकेतल्या हॉर्वर्ड विद्यापीठाच्या व्यवसाय शिक्षण विभागाचे अधिष्ठाता आहेत नितीन नोऱ्हिया. वॉरेन बफेट अनेकांना माहीत असतात. त्यांची बर्कशायर हाथवे ही प्रसिद्ध गुंतवणूक कंपनी. त्या कंपनीचे प्रमुख आहेत अजित जैन. अनेक महत्त्वाचे गुंतवणूक निर्णय तेच घेत असतात आणि माझ्यानंतर तेच कंपनीचे प्रमुख असतील, असं खुद्द बफेट यांनी एकदा नाही तर अनेकदा जाहीर केलेलं आहे. गुगल माहीत नाही, असा या भूतलावर एखाद-दुसराच असेल. तो शोधायचा झाल्यास गुगलच्या सर्च इंजिनचीच मदत घ्यावी लागेल. असो. तर या गुगलचा व्यवसाय प्रमुख आहे निकेश अरोरा. याशिवाय पेप्सीच्या चेन्नईच्या इंद्रा नुयी, सिटी बँकेचे, आपले नागपूरवाले प्रमुख विक्रम पंडित, जगातल्या सगळय़ात मोठय़ा पोलाद कंपनीचे प्रमुख लक्ष्मी मित्तल.. असे अनेक सांगता येतील.

मुद्दा हा की अचानक जगभरातल्या कंपन्यांना भारतीयांचा शोध कसा काय लागला? यावर भिन्न मतं आहेत. भारतीयांनाच लक्षात आलं आपण आपल्या देशातून बाहेर पडायला हवं.. कारण देशात राहून फार काही वर जाता येणार नाही, हे एक. दुसरं मत असं की या कंपन्यांना जाणवलं की जगात अडचणींच्या महासागरात पोहण्यासाठीचा दमसास भारतीयांकडे आहे, तेव्हा भारतीयांनी या कंपन्यांकडे जाण्याच्या ऐवजी या कंपन्याच भारतीयांना शोधत आल्या. काहीही असो. तपशील महत्त्वाचा नाही. दिसतंय ते हेच की भारतीय बुद्धिमत्ता आणि जगभरातील खाजगी उद्योग हे एकाच समेवर एकमेकांना भेटले. एगॉन झेडर इंटरनॅशनल या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा शोध आणि पुरवठा करणाऱ्या कंपनीचे प्रमुख जिल एडर ताज्या ‘टाइम’ साप्ताहिकात या वाढत्या भारतीय ओघाविषयी बोलताना म्हणाले, कमालीच्या अडचणीतही कसं तगून राहायचं आणि मार्ग काढायचा याचं प्रशिक्षण भारतीयांना त्यांच्या देशात आपोआपच मिळतं. त्यामुळे उच्च पदांसाठी ते योग्य ठरतात. या एगॉनने जगातल्या बलाढय़ कंपन्यांचा आढावाच सादर केला. फॉच्र्युन किंवा स्टँडर्ड अँड पुअर या अग्रमानांकित मानांकन संस्थेच्या आकडेवारीनुसार आजमितीला भारतीय हे अमेरिकेच्या खालोखाल सगळय़ात जास्त कंपन्यांचे प्रमुख आहेत. जगात बलाढय़ अशा वेगवेगळय़ा क्षेत्रांतल्या सर्वोच्च अशा २५ कंपन्यांपैकी सात कंपन्यांच्या प्रमुखपदी भारतीय आहेत. आपल्या मागे आहे कॅनडा. त्यांचे चार जण आहेत या यादीत.

आता हे चांगलं की वाईट? वरवर पाहिलं तर पारंपरिक आशावादी हे कळल्यावर भारताचा अरुणोदय होतोय म्हणत सूर्यनमस्कारही घालतील. पण या भारतोदयामागची कारणं या आशावादाला झाकोळून टाकणारी आहेत. अत्यंत कटकटी, भ्रष्ट नोकरशाही, पायाभूत सुविधांचा पूर्ण अभाव आाणि वरून स्थानिक राजकारण्यांची दादागिरी अशांना तोंड देत पुढे जायची सवय भारतीयांना असतेच. त्यामुळे अनेक कंपन्यांना प्रमुखपदी भारतीय हवासा वाटतो, असं मत अनेक अभ्यासकांनी नोंदवलंय. भारतात एखादा कारखाना काढायचा झाला तर लागणाऱ्या परवान्यांची संख्या किमान ८२ आणि कमाल २०० पर्यंतही जाऊ शकते. आणि वर हे एकाच ठिकाणी सगळे परवाने मिळतायत, असंही नाही. ८२ परवान्यांची ८२ ठिकाणं. तरीही इथे माणसं उद्योगी राहतात, हेच विशेष. विकसित देशांत हा आकडा १० किंवा १५ पेक्षा जास्त नाही. तेही सगळे एकाच ठिकाणी. तेव्हा इतकं सहन केलेल्या भारतीयाला कोणतीच अडचण मोठी वाटत नाही, असं व्यवसाय अभ्यासकांचं मत आहे.

जगभरातल्या अनेक मॅरेथॉन स्पर्धात बऱ्याचदा इथियोपियन स्पर्धक विजयी होतात. यावर या गरीब आफ्रिकी देशानं अभिमान बाळगायचा का? या विजेत्या इथियोपियनांविषयी एकदा एक क्रीडा समीक्षक म्हणाला होता, अरे त्यांना उपाशीपोटी, काटय़ाकुटय़ांतून धावायची सवय असते त्यामुळे हे लोक या स्पर्धा जिंकतात.

आपण भारतीयांचं हे इतकं नाही, पण असंच काहीसं होऊ लागलेलं आहे का? तसंच असावं. आपल्याकडच्या खाचखळग्यांना तोंड देत जगण्यापेक्षा गुळगुळीत परदेशी वातावरणात प्रगती साधणं जास्त सोपं होत चाललंय. गुलजारच्या घनगहिऱ्या शब्दांत सांगायचं झालं तर आपल्याकडे म्हणजे.. दिल दर्द का तुकडा है, पत्थर ही दली सी है.. एक अंधा कुवां है या बंद गली सी है..

त्यामुळेच मग ही मंडळी म्हणतायत.. छोड आयें हम वो गलियाँ..

Friday, 17 June 2011

जीवन प्रश्न?

अजून एक वळण
रस्त्यात वेचले काटे

वेळाने धरलंय मनगट
कोण कसा त्यातून निसटे?

जे आहे त्याचा घ्या फायदा
उगीच प्रश्न का मनी दाटे?

प्रश्न नाही मुळीच ते
जीवन वाटेला फुटलेले फाटे

आहे ते खरे असंबंध
मनाला तरी का बरोबर वाटे?

थांबून घ्या एक श्वास
गुंत्यातून धागा अलगद सुटे

गडद धुके हे विचारांचे
शेवटी सावकाशच फिटे

येतील अश्या अनेक रात्री
सोबत असतील सोनेरी किरणे पहाटे

-- पुष्कर हेमंत कुलकर्णी

Thursday, 9 June 2011

आय. आय. टी. संस्था जागतिक दर्जाच्या होण्यासाठी..!

अनिल काकोडकर लिखित आणि अनिल पं. कुलकर्णी अनुवादित उत्कृष्ठ लेख
लोकसत्ता - बुधवार ८ जून २०११.

जागतिक दर्जाच्या संस्थांचे वैशिष्टय़ म्हणजे त्यात मोठय़ा प्रमाणावर उच्च दर्जाच्या गुणांचा, ज्ञानाचा समन्वय असतो. कार्यक्षमता, विद्यार्थी, संस्था आणि अतिथी संशोधक, याशिवाय बाहेरील चांगल्या दर्जाच्या संस्थांशी सतत शैक्षणिक आणि संशोधनविषयक समन्वय, साधन-सामग्रीची यथायोग्य उपलब्धता अशी व्यवस्था या संस्थांमध्ये असते. अत्यंत उपयुक्त प्रशासन व्यवस्था ही आणखी एक वैशिष्टय़पूर्ण बाब! विद्यार्थी- संशोधकांमधील नव्या आणि विश्वसनीय कल्पनांची जाण ठेवून त्यांना उत्तेजन देणारी, पाठिंबा देणारी अशी ही प्रशासन व्यवस्था अत्यंत उपयोगी ठरते.

केंद्रीयमंत्री जयराम रमेश यांनी अलीकडेच केलेल्या वक्तव्याने भारतातील आय. आय. टी. (इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी) संस्थांबाबत वाद-चर्चा सुरू झाली आहे. आपल्या देशातील आय. आय. टी. संस्था सुमारे ५० वर्षांपासूनच्या आहेत आणि आय. आय. टी. पदवीधरांना जगभर मोठय़ा प्रमाणावर मागणी आहे. या पदवीचे मूल्य मोठे आहे हे प्रत्येकजण मान्य करील. आय. आय. टी. संस्था ज्या मूळ उद्देशाने स्थापन करण्यात आल्या, तो या संस्थांनी साध्य केला आहे, हेही निर्विवाद आहे. अर्थात आय. आय. टी. संस्थांमधील संशोधनाचे महत्त्व काहीसे उशिरा लक्षात आले असले तरी आज भारतातील तांत्रिक संशोधन आणि शिक्षण संस्थांमध्ये आय. आय. टी. संस्थांच अग्रणी आहेत हे नाकारता येणार नाही. अगदी जागतिक पातळीवर विचार केला तरी आय. आय. टी. संस्था क्रमवारीत पुढेच आहेत आणि अशा संस्थांना कमी लेखणे किंवा त्यांच्या कामाबद्दल, दर्जाबद्दल असमाधान व्यक्त करणे म्हणजे एकूण संपूर्ण प्रणालीलाच कार्यापासून परावृत्त करणे होय.

अर्थात भारतातील आय. आय. टी. संस्थांच्या कार्यावर नजर टाकल्यानंतर या संस्थांचा दर्जा आहे त्यापेक्षा अधिक वाढविण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे हे म्हणजे सयुक्तिकच ठरेल. हे काम करण्यासाठीच्या एका समितीचा प्रमुख म्हणून मला संधी मिळाली होती. त्या कामाचा अहवाल मनुष्यबळ विकास खात्याच्या संकेतस्थळावर (वेबसाइट) उपलब्ध आहे.

भारतासारख्या मोठय़ा देशात, आर्थिक विकास आघाडीवर वेगाने प्रगतीचे टप्पे गाठले जात असताना मोठय़ा प्रमाणावरील तंत्रज्ञानाभिमुख संशोधनावर भर द्यायलाच पाहिजे. ज्ञानाच्या कक्षा अधिक रुंदावून नवे आधुनिक तंत्रज्ञान विकसित करून आजच्या स्पर्धात्मक युगात जागतिक पटलावर भारताचे नाव प्रगती विकासाच्या बाबतीत एक अग्रणी राष्ट्र म्हणून पुढे नेणे क्रमप्राप्त आहे. भारताचा सर्वागीण विकास आणि आर्थिक विकास यासाठी विज्ञान तंत्रज्ञानाधारित नवनवे उपक्रम राबविले जाणे तितकेच आवश्यक आहे. हे साध्य करण्यासाठी पीएच. डी. झालेल्या संशोधकांचा मोठा ताफा पाहिजे. आजघडीला अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान क्षेत्रात पीएच. डी.प्राप्त करणाऱ्यांची संख्या आपल्या देशातील लोकसंख्येच्या तुलनेत खूपच कमी आहे. त्यामानाने अमेरिका आणि चीनमध्ये अशा संशोधकांची संख्या भारताच्या तुलनेत अधिक आहे. भारतात अभियांत्रिकीतील उच्च दर्जाच्या संशोधन आणि विकासात, तसेच उच्च दर्जाच्या मनुष्यबळ विकासात आय. आय. टी. संस्थांचे योगदान मोठे आहे. साहजिकच नवसंशोधनाचे आव्हान पेलणेही त्यांच्यावर आपसूक येऊन पडते. अत्याधुनिक, नवी, संशोधनाधारित तंत्रज्ञान निर्माण करण्याची जबाबदारी ओघानेच त्यांच्याकडे येते. या पाश्र्वभूमीवर पुरेशा किंबहुना मोठय़ा प्रमाणावर, व्यापक संशोधन पायाभूत सुविधा आणि आर्थिक साहाय्याची गरज आहे. देशाच्या सामाजिक आर्थिक विकास प्रगतीसाठी काम करण्याची क्षमता ज्यांच्या ठायी आहे, अशा गटांना पायाभूत सुविधा आणि आर्थिक पाठबळ देण्यात यावे. हे सर्व गट संयुक्तपणे कार्य करतील. याद्वारे आय. आय. टी. संस्थांमध्ये ज्ञानवृद्धीला पोषक वातावरण निर्माण होईल, अशी आशा वाटते. आय. आय. टी., विद्यार्थी आणि बाहेरील जग यांच्यात अत्यंत उपयोगी, उपयुक्त साखळी निर्माण होऊन त्याद्वारे आय. आय. टी. संस्थांमधील संशोधन अधिक अर्थपूर्ण होईल, असा विश्वास वाटतो. खऱ्या अर्थाने हे उद्दिष्ट गाठण्यासाठी आपल्याला गरज आहे, ती अथकपणे प्रयत्न कार्य सुरूच ठेवण्याची आणि आज उपलब्ध आहे, त्यापेक्षा अधिक व्यापक अशा प्रणालींची!

आय. आय. टी. संस्थांमध्ये अभियांत्रिकी पदवीधरांनी अधिकाधिक प्रमाणात संशोधनाचे आणि अध्यापनाचे कार्य हाती घ्यायला हवे. संशोधनाचा उच्च दर्जा त्यावरच अवलंबून आहे. देशातील उच्च पातळीवरील तांत्रिक उपक्रमांचा दर्जा वाढविण्याच्या दृष्टीने ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. आय. आय. टी.मधील ज्या विद्यार्थ्यांचे शिक्षण अद्याप पूर्ण झालेले नाही, जे अद्याप शिकत आहेत, त्यांना तसेच इतर संस्थांमधील विद्यार्थ्यांना पदवीच्या तिसऱ्या वर्षांपासूनच संशोधनकार्यात सहभागी करून घेणे गरजेचे आहे. आय. आय. टी. आणि बी. टेक.मधील एक विशेष गोष्ट म्हणजे मोठय़ा प्रमाणावरील उच्च दर्जाचे संशोधन करण्यासाठीचे शिक्षण! तेथील विद्यार्थ्यांना ही संधी फार लवकर दिली जाते. इतर संस्थांनीसुद्धा अशा प्रकारे आपल्या विद्यार्थ्यांना संशोधनाची संधी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.आपल्या देशात आज अभियांत्रिकी शिक्षणाचे चित्र, तोंडवळा कसा आहे? क्षमतेवर प्रचंड भार आणि दर्जा मात्र घसरता! याचा परिणाम म्हणजे आज राष्ट्रउभारणीसाठी आवश्यक असलेल्या अभियंत्यांची वानवा ही एक गोष्ट आणि दुसरे म्हणजे अभियांत्रिकी पदवीधारकांमध्ये निर्माण झालेले नैराश्य, उदासीनता!

ज्या संस्था चांगल्या प्रकारे चालत आहेत, त्या आय. आय. टी. संस्थांशी संलग्न केल्यास त्या संस्थांची वेगाने प्रगती होऊ शकेल, त्यांचा दर्जासुद्धा वाढेल.

जागतिक दर्जाच्या संस्थांचे वैशिष्टय़ म्हणजे त्यात मोठय़ा प्रमाणावर उच्च दर्जाच्या गुणांचा, ज्ञानाचा समन्वय असतो. कार्यक्षमता, विद्यार्थी, संस्था आणि अतिथी संशोधक, याशिवाय बाहेरील चांगल्या दर्जाच्या संस्थांशी सतत शैक्षणिक आणि संशोधनविषयक समन्वय, साधन-सामग्रीची यथायोग्य उपलब्धता अशी व्यवस्था या संस्थांमध्ये असते.

अत्यंत उपयुक्त प्रशासन व्यवस्था ही आणखी एक वैशिष्टय़पूर्ण बाब! विद्यार्थी- संशोधकांमधील नव्या आणि विश्वसनीय कल्पनांची जाण ठेवून त्यांना उत्तेजन देणारी, पाठिंबा देणारी अशी ही प्रशासन व्यवस्था अत्यंत उपयोगी ठरते.

आय. आय. टी. संस्थांची स्वायत्तता आणि त्यांना अर्थसाहाय्य या दोन गोष्टींकडे आज प्राधान्यक्रमाने लक्ष देणे आवश्यक आहे. दोन्ही गोष्टींचा गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे.

दर्जेदार संशोधनाला चालना, प्रोत्साहन, उत्तेजन देण्यामुळे आज प्रत्यक्ष डोळ्यासमोर नसलेल्या, निश्चित न केलेल्या नव्या क्षेत्रांमध्येसुद्धा जोमाने काम करण्याचा मार्ग सुकर होतो. तथापि, आय. आय. टी. संस्थांना पूर्ण स्वायत्तता दिल्याशिवाय हे शक्य नाही. कडक नियमांवर आधारित भूमिका घेणाऱ्या लोकांकडून आजच्या या आवश्यक गोष्टींना वेळीच योग्य, सकारात्मक प्रतिसाद मिळणे दुरापास्तच!सरकारी अर्थसाहाय्य मिळणाऱ्या संस्थांमध्ये आर्थिक स्वायत्तता आणण्यासाठीच एक मार्ग म्हणजे त्या संस्थांना स्वतंत्रपणे कारभार करण्यास मोकळीक देणे हा आहे. संस्थांची कार्यक्षमता, जबाबदारपणा आणि विश्वासार्हता या गोष्टी विविध विभागांत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या, दर्जा आणि केलेल्या संशोधनाचा दर्जा, याशिवाय राष्ट्रीय विकास, प्रगतीत दिले गेलेले योगदान आणि इतर तत्सम कसोटय़ा, निकष यांच्या आधारे निश्चित करता येऊ शकतील. सर्व गरजवंतांना सुलभ कर्जाची सुविधा उपलब्ध असावी. संपूर्ण अभ्यास आणि सखोल विचार केल्यानंतर ही योजना सहजशक्य असल्याचे लक्षात येते. तथापि, आय. आय. टी. संस्था जागतिक दर्जाच्या होण्याच्या दृष्टीने त्यांना कोणत्याही परिस्थितीत संपूर्ण स्वायत्तता देणे अनिवार्य आहे..!

Tuesday, 7 June 2011

पाऊस कोकणातला!

वेड लावी जीवा
हि पावसाळी हवा
थंड असूनही उबदार
माझ्या कोकणाचा गारवा

वर सुटलाय बेभान
दर्यानं घातलाय थैमान
रिपरिप, रिमझिम, टपटप, सरसर
सूर धरलाय पावसानं

माती सुगंध दरवळी
प्रफुल्लीत झाली बकुळी
तृणगालीचा हा हिरवा
पाणी धबधब्यात खेळी

सरसर धारांत चिंब भिजावं
मग कोपभर चहा घ्यावं
सगळ्यांनी एकदातरी आयुष्यात
पावसात माझ्या कोकणात यावं

-- पुष्कर हेमंत कुलकर्णी

Wednesday, 13 April 2011

मराठी अभिमान गीत

मराठी अभिमान गीत

कवी = सुरेश भट

संगीतकार = कौशल इनामदार


लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी

जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी

धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी

एवढ्या जगात माय मानतो मराठी


आमुच्या मनामनात दंगते मराठी

आमुच्या रगारगात रंगते मराठी

आमुच्या उराउरात स्पंदते मराठी

आमुच्या नसानसात नाचते मराठी


आमुच्या पिलापिलात जन्मते मराठी

आमुच्या लहानग्यात रंगते मराठी

आमुच्या मुलामुलीत खेळते मराठी

आमुच्या घराघरात वाढते मराठी


आमुच्या कुलाकुलात नांदते मराठी

येथल्या फुलाफुलात हासते मराठी

येथल्या दिशादिशात दाटते मराठी

येथल्या नगानगात गर्जते मराठी


येथल्या दरीदरीत हिंडते मराठी

येथल्या वनावनात गुंजते मराठी

येथल्या तरुलतात साजते मराठी

येथल्या कळीकळीत लाजते मराठी


येथल्या नभामधून वर्षते मराठी

येथल्या पिकांमधून डोलते मराठी

येथल्या नद्यांमधून वाहते मराठी

येथल्या चराचरात राहते मराठी


खालील ४ ओळी मूळ गीतात आहेत पण त्या अपरिहार्य कारणास्तव घेण्यात आल्या नाहीत. प्रकाशित झालेल्या पुस्तकातसुद्धा त्या सापडणार नाहीत


पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी

आपुल्या घरीच हाल सोसते मराठी

हे असे कितीक खेळ पाहते मराठी

शेवटी मदांध-तख्त फोडते मराठी


११२ प्रसिद्ध आणि ३५६ कोरस गायक/गायिका यांच्या ताफ्यातून बनलेले एक उत्कृष्ठ मराठी स्फुर्तीगीत!

मराठी अभिमान गीत येथे पहा

http://www.youtube.com/watch?v=7PktyRvXlMs

Sunday, 10 April 2011

लोकसंख्या लोकशक्ती!

डॉ. वसंत गोवारीकर यांचा लोकसत्ताच्या लोकरंग पुरवणीतला एक उत्कृष्ठ लेख.

भारताने आपल्या लोकसंख्येवर कमालीचे नियंत्रण आणण्यात यश मिळवले आहे. भारत लोकसंख्येच्या बाबतीत चीनला तीस वर्षांत मागे टाकेल, असे भाकित १९९१ सालच्या जनगणनेनंतर करण्यात आले होते. प्रत्यक्षात १९९१ पासून हा दर कमी होण्यास सुरुवात झाली आहे. आज भारताची लोकसंख्या १.२१ अब्ज झाली आहे, तर चीनची १.३० अब्ज आहे. आता यापुढील काळात देशात असलेल्या लोकांच्या बुद्धिमत्तेचा वापर अधिक कार्यक्षमतेने कसा करायचा, यावर लक्ष केंद्रित करणे अधिक उपयुक्त ठरणार आहे.

नोबेल पारितोषिक विजेते डॉ. सी. व्ही. रामन यांना मी १९६९ मध्ये अहमदाबादमध्ये भेटलो, तेव्हा ते म्हणाले होते की, भारताने जपानच्या पद्धतीने जायला हवे. माझ्याबरोबर तेव्हा विक्रम साराभाईही होते. डॉ. रामन म्हणाले की, हेन्री फोर्डने मोटारीचे उत्पादन सुरू केले खरे, पण अमेरिकेच्या बाजारपेठेत जपानमध्ये बनलेल्या मोटारींची संख्या काही कमी नाही. लोकसंख्येच्या दृष्टीने भारत हा आता एक मोठा देश बनू पाहातो आहे, हे खरे. पण आपण हेही लक्षात घेतले पाहिजे की, भारताने आपल्या लोकसंख्येवर कमालीचे नियंत्रण आणण्यात यश मिळवले आहे. अगदी विसाव्या शतकाच्या आरंभीच्या काळात मृत्यू पावणाऱ्यांमध्ये तरुणांचा आणि महिलांचा समावेश मोठय़ा प्रमाणावर असे. ही परिस्थिती अगदी स्वातंत्र्य मिळेपर्यंत काही प्रमाणात अशीच होती. तेव्हा १० पैकी ९ जण गरीबच असायचे. गरिबीच्या परिघाबाहेर असणारा एखादा अपुऱ्या औषधयोजनेमुळे मृत्यूला सामोरा जात असे. गेल्या साठ वर्षांत ही परिस्थिती खूपच बदलली आहे. आज दहापैकी २.५ माणसेच गरीब राहिली आहेत. गरिबांची संख्या कमी झाली आहे. त्याच्या जोडीला औषधशास्त्रात कमालीची प्रगती झाली आहे आणि त्याचा परिणाम माणसाच्या जीवनमानावर होतो आहे.

पण असे असूनही डॉ. सी. व्ही. रामन यांच्यानंतर भारताला आजवर एकदाही विज्ञानातील नोबेल पारितोषिक मिळालेले नाही. आजही जगात सर्वत्र ‘रामन इफेक्ट’ची चर्चा होत असते आणि त्याचे कारण या देशातील हुशारी हे आहे. भारत हा जपानसारखा एक हुशार देश आहे आणि या देशातील हुशार लोकांनी त्यांच्या हुशारीचा कल्पकतेने उपयोग करून घ्यायला हवा, हे रामन यांचे म्हणणे मला नंतरच्या काळात पटू लागले, त्यांच्या बोलण्याचा नवा अर्थही समजू शकला. डॉ. रामन यांच्यानंतर आजवर एकही नोबेल पारितोषिक न मिळणे याचा अर्थ त्यांच्या त्या वक्तव्यात होता, हे मला नंतर उमगले. जपानचे दर माणशी उत्पन्न अमेरिकेतील माणसाएवढे झाले, ते केवळ तेथील लोकांच्या हुशारीमुळे. जे भारतीय हुशार आहेत, ते परदेशात जात आहेत आणि गेल्या काही काळात ज्या भारतीय वंशाच्या व्यक्तींना नोबेल मिळाले, ते या देशात राहून संशोधन करतच नव्हते. मुद्दा हा की, गेल्या सहा दशकांत भारतीय समाजात मोठय़ा प्रमाणात बदल झाले आहेत.

''गेल्या काही दशकांत आपण कुटुंब नियोजनासाठीची पाश्र्वभूमी लोकशाही मार्गाने तयार करण्यात यशस्वी झालेलो आहोत. ‘एकच मूल’ ही जुलमी आणि यांत्रिक योजना राबवून लोकसंख्येवर नियंत्रण आणण्याच्या चीनच्या प्रयत्नांचे सारे जग कौतुक करत असताना भारताने मात्र स्वयंप्रेरणेने त्यासाठी दिलेले योगदान कितीतरी महत्त्वाचे आहे, असे मला वाटते. तसेच सरासरी आयुष्यमानही ६५ वर्षांपेक्षा अधिक झाले आहे. हे भारताचे यश दुर्लक्ष करण्यासारखे निश्चितच नाही.''

नुकत्याच जाहीर झालेल्या जनगणनेच्या प्राथमिक माहितीमुळे भारतीय लोक भयचकित झालेले दिसत आहेत. भारताची लोकसंख्या सुमारे एक अब्ज २१ कोटी एवढी झालेली असताना मला मात्र त्याबाबत वेगळेच संकेत देणे आवश्यक वाटते. १९११ मध्ये भारताची लोकसंख्या २५.२ कोटी होती आणि त्यानंतरच्या दहाच वर्षांंनी ती २५.१ कोटी झाली होती. म्हणजे दहा लाखांनी कमीच झाली होती. १९४७ साली भारताची फाळणी झाली आणि पाकिस्तानची निर्मिती झाली, तरीही भारताची लोकसंख्या ३६.१ कोटी एवढी झाली होती. माझ्या मते भारतातील लोकसंख्यावाढीचा वेग कमी होत असल्याचे चित्र आहे. लोकशाही पद्धतीने हा वेग कमी होतो आहे, हे माझ्या दृष्टीने विशेष आहे.

१९९२ मध्ये मी ‘इंडियन सायन्स काँग्रेस’चा अध्यक्ष असताना माझ्या अध्यक्षीय भाषणाचा विषय ‘विज्ञान, लोकसंख्या आणि विकास’ हा होता. त्याही वेळी भारताच्या लोकसंख्येचा वेग कमी होत आहे, या माझ्या विधानाने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले होते. या विषयावर मी लिहिलेल्या ‘द इनएव्हिटेबल प्लस’ या पुस्तकावर अनेकांनी टीकाही केली. जगातल्या अनेक लोकसंख्या तज्ज्ञांनी या पुस्तकावर आपले अभिप्राय व्यक्त केले. भारताच्या लोकसंख्येबद्दल आशायदायक चित्र चितारणारा मी बहुधा पहिलाच असल्याने त्याबाबत चर्चा होणे स्वाभाविकच होते.

गेल्या काही दशकांत जन्मदरात घट होत असल्याचे आपल्याला दिसते आहे. त्यासाठी आवश्यक असणारी मानसिकताही तयार होत असल्याचे आपण पाहतो आहोत. काही दशकांपूर्वीपर्यंत मुले जगण्याचे प्रमाण इतके कमी होते, की त्यातली काही मुले तरी जगतील, म्हणून पुष्कळ मुले होऊ द्यावीत, हा विचारही आता मागे पडत चालला आहे. पाच-सहा वर्षे जगणारे कोणतेही मूल पुढील काळात जिवंत राहण्यासाठीचे वैद्यकीय ज्ञानही आता उपलब्ध झाले आहे. तसेच सरासरी आयुष्यमानही ६५ वर्षांपेक्षा अधिक झाले आहे. हे भारताचे यश दुर्लक्ष करण्यासारखे निश्चितच नाही, असे मला वाटते.

कुटुंब नियोजनासारखे कार्यक्रम यापुढील काळात आवश्यकच नाहीत, असे माझे मुळीच म्हणणे नाही. परंतु लोकशाही मार्गाने गेल्या काही दशकांत आपण कुटुंब नियोजनासाठीची पाश्र्वभूमी तयार करण्यात यशस्वी झालेलो आहोत, हे मान्य करायला हवे. ‘एकच मूल’ ही जुलमी आणि यांत्रिक योजना राबवून लोकसंख्येवर नियंत्रण आणण्याच्या चीनच्या प्रयत्नांचे सारे जग कौतुक करत असताना भारताने मात्र स्वयंप्रेरणेने त्यासाठी दिलेले योगदान कितीतरी महत्त्वाचे आहे, असे मला वाटते. भारतीय समाज मोठय़ा प्रमाणावर अशिक्षित आहे, असे सांगितले जाते. भारतीय पावसाच्या अंदाजावर अभ्यास करत असताना मी देशातल्या अनेक भागातील अशा अनेक ‘अशिक्षितां’शी बोललो होतो. तेव्हा मला हे स्पष्टपणे जाणवले होते, की वस्तुस्थिती तशी नाही. हा सारा समाज आपल्या ज्ञानाबाबत खूपच आग्रही आहे. या निरक्षरांनीच भारतीय लोकसंख्यावाढीचा वेग आणि मृत्युदर कमी करण्यासाठी विचारपूर्वक प्रयत्न केलेले आहेत, हे विसरून चालणार नाही. या प्रयत्नांची तुलना आता युरोपीय देशांशीही होऊ शकते, अशी स्थिती आहे. अशिक्षितांनाही आपले हित समजते आहे, याचा हा एक प्रकारचा पुरावाच आहे. जे निरक्षर शेतकरी स्वातंत्र्य मिळाले तेव्हा देशभरात साठ हजार टन खते वापरत होते, तेच शेतकरी आता लाखो टन खत वापरतात, हेही आपण पाहतो आहोत. अमेरिकेतील फक्त एक टक्का समाज संपूर्ण देशाच्याच नव्हे, तर अतिरिक्त अन्नधान्य पिकवण्याची जबाबदारी समर्थपणे पेलतो, त्या तुलनेत भारतातील शेतकऱ्यांच्या टक्केवारीत स्वातंत्र्यानंतर किती फरक पडला, हे आपण पाहायला पाहिजे. स्वातंत्र्य मिळाले, तेव्हा देशात ९० टक्के जनता शेतकरी होती. आज साठ वर्षांनंतर ही टक्केवारी ६३ पर्यंत कमी झाली आहे.

भारत लोकसंख्येच्या बाबतीत तीस वर्षांत चीनला मागे टाकेल, असे भाकित १९९१ सालच्या जनगणनेनंतर करण्यात आले होते. तेव्हाही मी आशावादी होतो. मला भारताच्या लोकसंख्यावाढीचा दर लक्षणीयपणे खाली येण्याची चिन्हे दिसत होती. २०११ च्या जनगणनेनंतरची आकडेवारीही हेच सांगते की लोकसंख्या अपेक्षेपेक्षा कमी दराने वाढते आहे. पूर्वीच्या निकषांनुसार हा आकडा आता आहे, त्यापेक्षा कितीतरी जास्त असला असता. याचाच अर्थ लोकसंख्यावाढीचा वेग स्थिरावतो आहे, आणि काही प्रमाणात कमीही होत आहे. १९७१ पासून या प्रक्रियेला प्रारंभ झाला आणि १९८१ च्या जनगणनेत हे स्पष्ट झाले की लोकसंख्यावाढीचा वेग कमी होतो आहे. १९९१ पासून हा वाढीचा दर कमी होण्यास सुरुवात झाली आहे.

भारत हा बुद्धिमान देश आहे. तेथील समाज खऱ्या अर्थाने हुशार आहे. ही हुशारी आणि बुद्धिमत्ता वापरण्याची मानसिकता यापुढील काळात आपण निर्माण करणे फार आवश्यक आहे. डॉ. सी. व्ही. रामन यांनी १९६९ मध्ये माझ्याशी बोलताना जे वक्तव्य केले होते, त्याचा अर्थ आता उमगतो आहे. भारताने लोकसंख्यावाढीच्या वेगावर नियंत्रण मिळवले, म्हणजे सारे काही झाले, असे समजणे चुकीचे आहे. यापुढील काळात भारताने आपली बुद्धिमत्ता उपयोगात आणण्यासाठी आपली सारी शक्ती खर्ची घातली पाहिजे. ‘न्यूयॉर्क टाइम्स’च्या १ सप्टेंबर २००६ च्या अंकात ब्रॅडस्टर यांनी असे भाकित केले होते की, २०३० पर्यंत भारत चीनला मागे टाकण्याची सुतराम शक्यता नाही. १९९१ मध्ये केलेल्या भाकितानुसार यंदा भारताने लोकसंख्येच्या बाबतीत चीनला मागे टाकायला हवे होते. परंतु भारताची लोकसंख्या १.२१ अब्ज झाली आहे, तर चीनची १.३० अब्ज आहे. देशात असलेल्या लोकांच्या बुद्धिमत्तेचा वापर अधिक कार्यक्षमतेने कसा करायचा, यावरच यापुढील काळात लक्ष केंद्रित करणे अधिक उपयुक्त ठरणार आहे.

Thursday, 7 April 2011

क्रिकेट विश्वचषकानंतर नाना पाटेकरांची प्रतिक्रिया...

तुझं असणं हे आमचं असणं आहे...

खांद्याच्या पालखीत चेंडूफळीच्या देवाला बसवून मैदानाची प्रदक्षिणा सुरू झाली आणि आसमंतात केवळ घंटानाद निनादायला लागला.

आतषबाजी...!

हर्षाच्या टिकल्यांनी काळोख सवाष्ण झाला. प्रकाशाचा फडा पडला. क्षितिजावर डुबकी मारलेला सूर्य सोहळा पहायला पुन्हा वर आल्यासारखं वाटलं.

मैदानावरच्या साऱ्यांचा मिळून एकच चेहरा, आनंदानं लिंपलेला. साऱ्यांच्या डोळ्यांच्या पणत्या आणि या सुपूत्राचं औक्षण. दोन दशकं आमची मान उंच ठेवली यानं. दिलेल्या आनंदाचं मोजमाप करता येत नाही.

जीवंतपणी आख्यायिका झालेल्या या वामनाने काय पादाक्रांत करायचं ठेवलं? डोळ्यात कायम तीन रंग गोंदलेले...

आज मात्र डोळ्यांच्या कडेला समुद वस्तीला आल्यासारखं दिसलं. बाहेरचा, आतला कोलाहल पापण्यांच्या कडांवर धडकत होता. शिंतोडे उडत होते. आवरलं तरी आवरत नव्हतं. इतकं मोठं वादळ प्रथमच अवतरलं होतं. एरवी आतलं तुफान पृष्ठभागावर कधीच आलं नव्हतं. चक्रव्यूहात केवळ घुसण्याची नाही तर यशस्वीपणे बाहेर येण्याची कुवत असलेल्या या अभिमन्यूच्या डोळ्यात प्रथमच दवबिंदू चमकत होते. 'हळवं' या शब्दाचा नेमका अर्थ रैना-पठाणच्या खांद्यावर हिंदकळत होता. उंचावलेला हात निरोपाचा होता का?

नक्कीच नसावा!

नसू देत!

हा प्रश्नसुद्धा भयाण आहे. जुने लोक म्हणतात 'आमच्यावेळी अमूक अमूक खेळाडू होता'. तुझ्याबाबतीत असं म्हणता येत नाही. तू सगळ्यांच्या वेळी होतास, आहेस आणि अस. तुझं असणं हे आमचं असणं आहे. आमचं एरवीचं जगणं कसंही असो. पण तू ते खूप सुसह्य केलं आहेस.

झोपडीतला मी, ब्लॉकमधला मी, बंगल्यातला मी. भ्रष्ट मी. सज्जन (?) मी... आम्हा सगळ्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहेस तू. उंचावलेला हात ओळखीचा असू दे; निरोपाचा नको.

रस्त्यावर मैदानातल्या गवतासारखी माणसं उगवली होती. ब्रिटीशांनंतर मुंबई पहिल्यांदाच एवढी घनदाट वाटली. मुंबईच का; सारा भारतच. स्वातंत्र्याचा लढा पुन्हा सुरू झाल्यासारखं वाटलं. आपण विश्वचषक जिंकला. तुम्हा सगळ्यांचं अभिनंदन.

एकच गोष्ट मनात आली की अत्याचार, भ्रष्टाचाराविरुद्ध आमची लोकं रस्त्यावर अशी कधी उतरतील?

ज्या दिवशी उतरतील, त्या दिवशी आम्ही सारंच जिंकलेलं असेल.

- नाना पाटेकर